सी.रामचंद्र – भाग ५

साल १९५४, ह्या वर्षी अण्णांचं संगीत असलेले कवी, मीनार, नास्तिक, पेहेली झलक, सुबह का तारा हे बोलपट आले. ह्या पैकी नास्तिक ह्या बोलपटाने चांगल यश संपादन केले. हा फिल्मिस्तानने निर्माण केलेला बोलपट होता, आणि अण्णांनी फिल्मीस्तानबरोबर केलेला शेवटचा बोलपट.
ह्या बोलपटातील देख तेरे संसार की हालत, कान्हा बजाए बंसुरी, तेरे फुलों से भी प्यार तेरे काँटो से भी प्यार, गगन झनझना रहा, अरे ओ पत्थर के भगवान ही गाणी खूपच गाजली. ह्या बोलपटाच्या संगीतात अण्णांनी वैष्णव भजनांचा छान उपयोग करून घेतला.
पेहेली झलक बोलपटातील, जमीं चल रही आसमाँ चल रहा है, चरणदास को पीने जो आदत ना होती, सखी कैसे भाए ऋत सावन की ही गाणी लोकांच्या पसंतीस उतरली. जमीं चल रही ह्या गाण्याचा तत्वचिंतनात्मक सूर एव्हढा छान लागलाय की बस्स्…….चरणदासको पीने की जो आदत ना होती हे किशोर्-कुमारने म्हटलेले गंमतीदार गाणे, तर सखी कैसे भाए ऋत सावन की हे खास अण्णा-लता टीमचे छान गाणे…भारतीय शास्त्रीय संगीताने नटलेले.
हे वर्षं अण्णा-तलत टीमचं खास वर्षं. सुबह का तारा मधे तलत-लताचं गया अंधेरा हुआ उजाला चमका चमका सुबह का तारा हे सुंदर युगल-गीत, तर विफल प्रीतीचं गीत अपनी नाकामी से मुझको काम है. ह्या गाण्यातील गिटारीचे तुकडे खूपच छान आहेत. ही अण्णांची खासियतच होती. मीनार मध्ये तलत-लताचं जरा मुडके तो देखो साजना हे युगलगीत, तर कभी तनहाईयोंमें एक ऐसी भी घडी आई ही अप्रतिम गजल तलतने गायली.
कवी बोलपट तर ह्यांच्या कामगिरीचा कळस होता. ह्यात तलतची तब्बल ७ गाणी होती. माझ्या माहीतीनुसार तलतने ५ सोलो, १ लताबाईंबरोबर युगल गीत, एक रफीबरोबर युगल गीत अशी गाणी गाईली. लताबाईंना फक्त ते तलतबरोबरचं युगुलगीत होतं ते म्ह्णजे तेरे रस्ते पे हमने एक घर बना लिया है हे अप्रतिम गीत.
१९५५ ला आझाद, दुनिया गोल है, इन्सानियत, लुटेरा, सावधान, तीरंदाज आणि यास्मिन हे बोलपट आले. इन्सानियत हा दिलीप्-देव ह्यांना घेउन बनवलेला एका तलवारपट. संगीताला भरपूर वाव होता, पण अण्णांनी निराशा केली. ह्यात तब्बल १७ गाणी होती पण चांगली फारच थोडी होती. तलत्-लताच, आई बरखा बहार लाई दिलका करार आणि रफिनं गायलेलं अपनी छाया में भगवन बिठा ले मुझे, मैं हूं तेरा तू अपना बनाले मुझे ही दोन गाणी मात्र गाजली.लुटेरा आणि तीरंदाजला पण छान संगीत दिलं होतं पण ह्यातली गाणी आत्ता माझ्या लक्षात नाहीत. यास्मिनमध्ये परत अण्णांनी धमाल उडवून दिली. हंस हंस के हसीनो ने नजर चार किये जा, मुझ पे इल्जाम्-ए-बेवफाई है, तुम अपनी याद भी दिल से, बेचैन नजर बेताब जिगर ही गाणी तूफान गाजली, पण तरीही वर्षं गाजवलं आझाद ने.
पक्षीराजा स्टुडीओने एक तमिळ बोलपट बनवला आणि तो तूफान चालला. इतका चालला की निर्माता एस्.के.एस. नायडू ह्यांनी चित्रपटाचा सेट तसाच ठेउन एक मोठा हिंदी बोलपट बनवायचे ठरवले. एका महीन्यात चित्रीकरण उरकायचे ठरवले. त्याने मुंबईला येउन दिलीपकुमार आणि मीनाकुमारीला करारबद्ध केले आणि नौशादला संगीतकार म्हणून करारबद्ध करायला गेला. पण एका महीन्यात संगीत द्यायचे, ते ही ८-१० गाणी हे ऐकून नौशाद उखडला आणि त्याने नायडूकडे असमर्थता व्यक्त केली. अखेर नायडूला कोणीतरी(की खुद्द नौशादनेच) राम चितळकरांचं नाव सुचवलं. नायडू चितळकरांच्या दारी आला. अण्णांनी सर्व-प्रथम नौशादहून जास्त मानधनाची अट कबूल करून घेतली. यथावकाश अण्णा आणि गीतकार राजेंद्र कृष्ण मद्रास शहरी दाखल झाले. एका हॉटेलमध्ये नायडूनी व्यवस्था करून ठेवली होती. पुढचे ७-८ दिवस अण्णा आणि राजेंद्र कृष्ण हे दोघेही मद्रास भटकत होते आणि मजबूत खात पीत होते. असं करता करता आठवडा गेला. नायडूला गाण्यांची काळजी वाटू लागली. त्याच बाकी चित्रीकरण आटपत आलं होतं आणि फक्त गाण्यांचं चित्रीकरण राहाणार होतं. अखेर एक दिवस नायडू भडकून हॉटेलवर आला आणि मी गाणी घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशी धमकी दिली. अखेर हा जीव असाच पिडत राहील हे जाणून संध्याकाळी अण्णा हर्मोनियमवर बसले. राजेंद्र कृष्ण समोरच सिगारेटचं पाकीट घेउन बसला, पा़कीटावरच सटासट गाणी लिहीत गेला आणि अण्णा पटापट चाली देत गेले. सकाळपर्यंत ९ गाणी तयार झाली होती आणि नायडूकडे ते कागद देऊन आता रेकॉर्डिंगचं बघा असं म्हणून, हे दोघं परत दंगा करायला मोकळे.
आझादचं रेकॉर्डींगही झटपट आटपलं. त्याकाळी रेकॉर्डींगसाठी मेणाच्या तबकड्या वापरत आणि त्या फक्त ३ मिनिटाचं रेकॉर्डींग करू शकत. काही चूक झाली तर आख्खी तब़कडी वाया जात असे. गाणं लांबलं तर फक्त ३ मिनिटांचच गाण रेकॉर्ड होत असे. पण लताबाईंनी गायलेले जा री जा री ओ कारी बदरीया हे गाण एकाच टेक मध्ये ओ.के. झाल. कितना हंसी है मौसम हे गाणं रेकॉर्ड होताना, तलत येउ शकला नाही, त्यामुळे ते गाणं अण्णा स्वत:च गायले. ते गाणं इतक्या मुलायम आवाजात गायले की अनेक जण गायक तलत आहे असं समजून फसले. गीतकार शैलेंद्र ने तर अण्णांशीच १०० रू. ची पैज लावली आणि अर्थातच तो हरला..
१९५६ साली अण्णांचे ३ बोलपट आले. २६ जनवरी, शतरंज आणि देवता. पैकी शतरंज आणि देवता खूप चालले. शतरंज मधले बदली छुपे चांद ने कुछ मुझसे कहा है हे लता-हेमंतचं गाणं गाजलं. देवतामधील अनेक गाणी गाजली. सगळ्यात गाजलेले आणि अनेक जणांनी ऐकलेले गाणं म्हणजे कैसे आउं जमुना के तीर हे लताबाईंनी गायलेले भैरवीतले गाणे. अण्णांनी ह्यात लताबाईंना अजून एक वेगळे गाणं दिलय, जालीम तेरी आखों ने क्या चीज पिलाई है….लताबाईंनी आपल्या गोड आवाजात सगळी मादकता आणून ते गाणं म्हटलय. तसंच ऐ चांद कल जो आना, सूना है मेरे दिल का जहां ही गाणी आणि खास अण्णांची हातखंडा अंगाई दो नैनो का बना झूलना. आशाबाईंनी खास आपल्या मादक शैलीत आणि खणखणीत आवाजात म्हटलेले फूलोंके मेले हम है अकेले आणि लता-तलतचं सुमधुर युगुलगीत, किसी से प्यार है हमको मगर हम ना बताएंगे.

सी.रामचंद्र – भाग ४

१९५२ साल सुरेल संगीताचा वर्षाव करण्याची परंपरा घेउन आलं. ह्या साली अण्णांनी छत्रपती शिवाजी ह्या मराठी बोलपटाला सुद्धा संगीत दिलं. ह्या शिवाय घुंगरू, हंगामा, परछांई, साकी आणि शिनशिनाकी बुबलाबू ह्या बोलपटांना संगीत दिलं. घुंगरू मधली दिले बेकरार सोजा, मै अपने दिल का अफसाना सुना लुं, काली काली रतीयां याद सताए, बदनाम हो रहा है ही खास लता-अण्णा स्टाईल गाणी अवीट गोडीची आहेत. हंगामा मधील, तेरे दर से खुशी मांगी मगर गम दे दिया तुने, मेरी सखी बता, झूम झूम झूम झूम रही प्यार की दुनिया(लता-चितळकर) ही गाणी गाजली. ह्याच्याच थोडं आधीची गोष्ट…..तलत महमूद पार्श्वगायक म्हणून गाजू लागला होता. आपल्या हळुवार, मृदु-मुलायम आणि कंप असलेल्या आवाजात गायलेली गाणी लोकांचा हळवा कोपरा बनली होती. विशेषतः दिलीप-तलत जोडी खास जमली होती. माधव मोहोळकरांनी गीतयात्री मधे लिहिलं, “आमचा लाडका भग्नहृदयी प्रेमवीर दिलीप, जेंव्हा वठलेल्या झाडाजवळ बसून, तलतच्या आवाजात ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल म्हणताना पाहिला तेव्हां किती किती आनंद झाला.” बाबुलनंतर एका संगीतकाराने त्याला त्याचा कंप हा मोठा दोष असल्याचं सांगितलं आणि तलत सपाट आवाजात गाउ लागला..त्याचबरोबर त्याच्या आवाजात दोष आहे अश्या बातम्याही पसरत होत्या. एकदा अनिलदाच्या रेकॉर्डिंगला तलत सपाट आवाजात गात होता. अनिलदा म्हणाला,”अरे तू कोण आहेस? जा इथून आणि आमच्या तलतला घेउन ये.” अनिलदाने तलतला खडसावून सांगीतल की हा नैसर्गिक कंपच तुझा मोठा ठेवाठेवा, नाहीतर गल्लोगल्ली तलत सापडेल. तलत मग नवीन आत्मविश्वासाने गात होता. अण्णांना दुसरे अण्णा म्हंजे शांतारामबापूंनी परछांईसाठी करारबद्ध केलं. अण्णांनी पहिले छूट सांगितलं,”माझ्या रचना लताच गाईल, जयश्रीबाई नाही”. बापू कबुल झाले नंतर एका गाण्यासाठी चाल बांधून अण्णा चर्चा करायला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कल्पनेहुन वेगळ्या प्रकारे चित्रीकरण होणार आहे. बापूंशी लगेच चर्चा झाली आणि बापूंनी अण्णांना नवं गाणं रचायला अवधी दिला आणि शुटींग थांबवलं. अण्णा चाल बांधून गायकाचा विचार करत चालले होते आणि एकदम मदनचं आशियाना बोलपटाचं रेकॉर्डिंग आहे हे आठवलं म्हणून स्टुडिओत डोकावले तर तलत आपल्या मधुर आवाजात गात होता,”मेरा करार ले जा मुझे बेकरार कर जा”. गाण संपल्यावर अण्णा म्हणाले,”अरे तलत तुझ्या आवाजाला काहीच धाड भरली नाही..मी भलतच ऐकल होत..खैर, उद्या ये, आपल्याला गाणं रेकॉर्ड करायचय. दुसर्या दिवशी परछांईमधल, मुहोब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने” हे गाणं रेकोर्ड झाल. माधुर्य हे अण्णांच्या संगीताचा स्थायिभाव होतं. स्त्री गायिकात लता आणि पुरूष गायकात तलतने ह्या माधुर्याची पुरेपुर बरसात रसिकांवर केली. तलतने गायलेली अण्णांची गाणी ऐकताना हा गोडवा जास्त प्रकर्षाने अधोरेखीत होतो. तलतने अण्णांविषयी म्हटले होते,”अण्णा म्हणजे राजा माणूस. एखाद दिवस फोन वाजायचा,”तल उद्या रेकॉर्डिंग आहे, स्टुडिओत ये.” मी म्हणायचो,”अण्णा थोडी तालीम करूया”. तिथून हसून उत्तर यायचं,”काही गरज नाही”, आणि फोन ठेवायचे. पण काय मधाळ चाली द्यायचे!!! संतोषी आणि राजेंद्र कृष्णची गाणी मधात बुडवून काढायचे!!!!!” परछांईमधील सगळी गाणी गाजली. शिन शिनाकी बुबलाबु मध्ये ब्लु नोट्स मध्ये त्यांनी हिंदी सिनेमामधील पहिल गाणं दिल. त्या नंतरही ब्लु नोटमधे फार कमी गाणी आली. शिनशिनाकी मधल लताने गायलेल्,”तुम क्या जानो तुम्हारी याद में” हे गाण तर चिरस्मरणीय आहे. हे गाणं गीतकार संतोषीने लिहिलं. एके काळी त्यांची फार चलती होती. ते निर्माताही होते आणि यशस्वी चित्रपट बनवले त्यांनी. रेहाना ही त्या काळची लोकप्रिय नायिका. कालांतराने संतोषी तिच्या नादी लागले. सतत तिच्याबरोबर असत, तिला बंगला घेउन दिला, पार पागल झाला माणूस!!!! काळ बदलला…संतोषींची सद्दी संपली आणि उतरता काळ सुरू झाला. मग रेहानाने संबंध तोडले, पण प्रेमवेडा संतोषी तिला भेटायला झुरू लागला, दरवाज्याबाहेर भिकर्यासारखा उभा राहिला. थंडीत एके रात्री तिला भेटायला म्हणून गेला, रेहानाने दुरूनच येताना पाहिला व दरवानाला दार बंद करून घ्यायला सांगितलं….वेडा संतोषी त्या तसल्या थंडीत रात्रभर तिच्या दाराशी पडून होता. तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए….रैन गुजारी तारे गिन गिन, चैन से जब तुम सोए……….. १९५२ च्या सुमारास अण्णा चित्रपट निर्माते झाले आणि त्यांनी झांजर हा चित्रपट बनवायला घेतला. ह्या साली त्यांचे झमेला, लहरे व प्रेमनाथनिर्मित शगूफा हे अजून तीन बोलपट आले, पण हे वर्षं लक्षात राहील ते त्यांच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वात उत्कृष्ट संगीतनिर्मीतीमुळे….तो बोलपट होता..फिल्मीस्तानचा अनारकली……..पुढे एकदा बोलताना अण्णा म्हणाले होते, कि झांजर माझ होम प्रोडक्शन…अनारकलीची गाणी हिट होतील हे माहीत असत तर त्या चाली झांजरला दिल्या असत्या.. अनारकलीतील जमाना ये समझा के हम पीके आए ह्या गाण्यावर काम चालू होतं. प्रसंग असा होता की अनारकली अकबरासमोर गाणं सादर करणार अस्ते,पण एक जळणारी तिच्या पेयात दारू मिसळते.अनारकलीच्य ते उशीरा लक्षात येते आणि तो पर्यंत ती अकबराच्या दरबारात पोहोचली असते, आणि तीला गाणं सादर करायचं अस्तं आणि मदीरेचा अंमल सुद्धा लपवायचा अस्तो. शब्द चालीत अलगद बसत होते, पण मुखडयाच्या शेवटची ओळ, जमाना ये समझा के हम पीके आए…पी के आए. ह्यात एका अक्षराचं अंतर पडत होतं आणि ते कसं भराव ते सुचत नव्हत. विचार करून वैतागलेले अण्णा काहि सामान घेऊन घरी गेले. कुलूप उघडताना त्यांना उचक्या येऊ लागल्या आणि ते पुरते हैराण झाले. सामान कसंबसं आत ठेऊन पाणी प्यायले…..आणि एकदम काहीतरी सुचलं..पेटी घेऊन जमाना ये समझा के हम पीके आए (उचकी) पी के आए…असं म्हटल आणि आपला प्रश्न सुटला हे लक्षात आलं. मग लगेच लताला घेऊन रेकॉर्डींगही केल आणि दुसर्या कामात गढून गेले. मुखर्जींनी गाणं ऐकलं अणि ते पिसाळले..ही काय फालतूगिरी आहे, उचक्या बिचक्या काय टाकता असं म्हणाले. पण फिल्मीस्तानने एकदम लो बजेट ठेवल्याने त्यांना काही करता नाही आलं आणि ते गाणं त्या उचकीसकट प्रसिद्ध झालं. तेंव्हापासून बेवड्याच्या गाण्यात उचकी मस्ट झाली.

सी.रामचंद्र – भाग ३

१९५० हे साल, अप्रतिम आणि कर्णमधुर संगीताने नटलेले बोलपट तर घेउन आलच, पण त्याच बरोबर पुढील अनेक वर्षं कानसेनांना ही मेजवानी मिळत रहाणार आहे हे आश्वासनसुद्धा घेउन आलं. ह्या सालाने, नौशाद आणि रामचंद्र ह्यांच बॉक्स ऑफिसवरचं सार्वभौमत्व सिद्ध केलं, आणि शंकर-जयकिशन, मदन मोहन, रोशन, ओ.पी.नय्यर्,अनिल विश्वास आणि एस.डी.बर्मन हे संगीतकार मिळून अनेक वर्ष तृप्त करणारं संगीत देणार आहेत ह्याची खात्री सुद्धा दिली. ह्या साली अण्णांनी निराला, समाधी, संगीता आणि सरगम हे बोलपट दिले. समाधी आणि सरगम धो धो चालले. दोन्ही बोलपटात अण्णांनी वैशिष्ट्यपूर्ण पाश्चात्त्य आणि भारतीय संगीतावर आधारीत गाणी दिली.
एव्हाना सी.रामचंद्र ह्या संगीतकाराची प्रतिभा इंडस्ट्रीवाल्यांना माहीत झाली. एकाच वर्षी ४-५ बोलपट करून प्रत्येक बोलपटात चांगलं संगीत देणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामूळे सी.रामचंद्र हे नाव सर्वांना माहीत झाले. एव्हांना अण्णांची संगीतशैली सुद्धा विकसीत झाली होती. पाश्चात्य संगीतशैलीत दिलेली अथवा कव्वालीसदृश असलेली खट्याळ गाणी जी दोन, तीन वा प्रसंगी चार गायकांनी कोरस सहीत म्हटलेली. ही गाणी एकंदरीतच धमाल मूड बनवतात आणि धिंगाणा घालायचा आपला मनोदय जाहीर करतात उदा:- खिडकी मधल किस्मत हमारे साथ है जलने वाले जला करे हे कव्वाली शैलीतल गाण, अथवा चिरतरूण राहीलेली संडे के संडे आणि समाधी मधील गोरे गोरे ओ बांके छोरे ही पाश्चात्य धाटणीची गाणी आणि मेळ्यातील गाण्यांच्या शैलीतील ओ दिलवालों दिल का लगाना आणि मेरे पिया गये रंगून ही पतंगामधील गाणी त्याचीच उदाहरणे..आणि ही गाणी सादर करणारे धिंगाणा कलाकार बहुदा गोप, याकुब अथवा भगवानदादा असत. ह्या एकूण संगीतावर पाश्चात्य छाप असे आणि त्या जीवनशैलीबद्दलचे आकर्षण ह्या संगीतात प्रतिबिंबित झाल आहे असं म्हणता येईल.संगीता मधील नाउम्मीद होके भी , समाधीमधील अभी शाम आयेगी निकलेंगे तारे, वो पास आ रहे है, निरालामधील मेहेफिल में जल उठी शमा, ऐसी मुहोब्बत से हम बाज आये, जोर लगालो टूटी गाडी आणि सरगम मधील, जब दिल को सतावे गम, रे ग म ग रे सानी ही शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी तर मैं हू अलादीन आणि धमाल ,मैं हू एक खलासी मेरा नाम है भीमपलासी ह्या गाण्यांनी लोकाना वेडं केलं होतं. संगीतकार श्री. शंकर ह्यांनी एका मुलाखतीत म्हटल होतं की मेहेफिल में जल उठी शमा हे गाण संगीतकारांना सुद्धा आवडायचं, आणि स्वतः श्री. शंकर ह्यांनी काही गाणी त्या शैलीत बनवली.
यश पाठीशी असल तरी अण्णा आणि भगवान ह्या मित्रांत फरक नव्हता पडला. त्यांच भेटणं, दंगा मस्ती करणं , रेल्वे कँटीनमधे बसून पिणं हे चालूच होत. एकदा भगवान त्याच्या एका बोलपटाचं रश प्रिंट बघत होता आणि मागून आवाज आला, “मजा आ गया दादा!!!”…बघतो तर मागे राज कपूर. तो म्हणाला, “मला जेंव्हा जेंव्हा कळत की तुम्ही रश प्रिंट बघताय, मी पण लपून बघतो…मला खूप कल्पना मिळतात.” हे ऐकून भगवान आश्चर्यचकीत झाला. मग राज कपूर म्हणाला,”दादा कब तक ये ऐसी फिल्में करोगे? ये पीला हाउस छोडो, वर्ना लोग बोलेंगे भगवान राज कपूर को कॉपी करता है!!!”. डोक्यात किडा टाकून कपूर निघून गेला. काही दिवस गेले आणि रेल्वे कँटीनमधे पिणं जोरात चालू असताना राम एकदम म्हणाला,”भगवान यार ऐसा कुछ करते है के साला ईंडस्ट्री के इतिहाससे अपना नाम कोई नही हटा पायेगा….” भगवानला चढलेली खाडकन उतरली…पुढचे काही दिवस राज कपूर आणि रामचे ते शब्द त्याचा पाठलाग करत होते आणि अखेर ह्या अस्वस्थतेतूनच एक अजरामर बोलपट जन्मला अलबेला
१९५१ साल प्रचंड यश घेउन आलं. अलबेला, खजाना, सगाइ, संग्राम, सौदागर, शबिस्तान आणि उस्ताद पेद्रो हे तब्बल सहा बोलपट अण्णांच्या संगीताने नटले होते. अलबेलावर वेगळ लिहायची गरजच नाही…कहर चित्रपट आणि कहर संगीत. गरबा शैलीतले भोली सुरत दिल के खोटे, कॅबरेट स्टाइलचं दिवाना परवाना आणि दोन भिन्न शैलींच मिश्रण केलेलं दिवाना परवाना, अरबी शैलीतल पण रागदारीवर आधारीत मेहेफिल में मेरी कौन ये दिवाना आ गया ही गाणी तूफान गाजली. ह्या धिंगाणा गाण्याबरोबरच, वेस्टर्न शैलीत, गिटार, पियानोचे लाडीक पीसेस टाकत बनवलेलं दिल धडके नजर शरमाए , खास भरतीय शैलीतल लाडिक बलमा बडा नादान आणि कदाचित ह्यांचा कळंस धीरे से आजा रे अखियन में ही तरल आणि आईच्या मायेने व बाळाला मांडीवर झोपवताना जो ताल येतो त्या तालाने भारलेली ही अंगाई. खुद्द अण्णा म्हणाले होते की ही रचना करताना मी मुल मांडीवर घेउन कसं झोपवतात ह्याचा विचार करून त्याच लयीत ही अंगाई बांधली. खजाना मध्ये खास अण्णा-लता टीमची रचना ऐ चांद प्यार तेरा ही अनेकांना मोहवून गेली. तर सगाई मधील लता तलतचं मुहोब्बत में ऐसे जमाने भी आए हे त्यांच्या सर्वोत्तम द्वंद्वगीतात जाऊन बसल. संग्राममध्ये अरूणकुमारने गायलेल वो उनका मुस्कुराना आणि लता-चितळकर ह्यांनी गायलेले उल्फत के जादू का दिलपे असर है हि गाणी भरपूर गाजली.
शबिस्तानमध्ये विभुती मित्रा संगीतात ना़क खुपसायला लागला म्हणून तो बोलपट अण्णांनी सोडला, पण त्यांचा असिस्टंट आणि मित्र मदन मोहन संगीतकार म्हणून आल्यावर अण्णांनी मदत केली आणि संगीतकार म्हणूनसुद्धा मदनचच नाव दिल. असं म्हणतात की मदन मोहनच्य पिताश्रींनीच सी.रामचंद्रना मदनला असिस्टंट म्हणून घ्यायची विनंती केली आणि फिल्मीस्तानचं कारकिर्दीत भरीव योगदान आहे आणि वैयक्तीक संबंध म्हणून अण्णांनी स्वतःच नाव लावलं नाही. श्री मदन मोहन ह्यांच्या वेबसाईट्वर मात्र अण्णांच्या ह्या बाबींची माहीती नाही…किंबहुना मदन मोहन आणि अण्णा ह्यांचे वैयक्तीक नातं फार चांगल होत ह्याचा कुठलाही उल्लेख नाही, ही नोंद करू इच्छीतो.
एकंदरीतच सी.रामचंद्रमहीमा वाढीस लागला होता. चितळकर ह्या नावाने गायलेली गाणीही गाजू लागली. लताबरोबरचं कॉम्बीनेशन तर डेडली होतं. संगीतकार-गायक ह्यांच्यात द्वैत नसलं की काय होउ शकत ह्याचं सर्वोत्तम उदाहरण. हीच अनुभुती पुढे लता-मदन आणि आशा-नय्यर जोडीने दिली.

सीवर्डस्टोन भाग ५

तर ठरवल्याप्रमाणे अस्मादीक आमच्या सहकार्यांसोबत अमाप उत्साहाने सळसळत टेस्कोकडे निघालो. सर्वप्रथम प्रथेनुसार कसं जाव ह्यावर चर्चा झडली आणि रू., पै, आणे….चुकलो, पौंड आणि सेंट(च ना? नाही नाही पेन्स) ह्याचा हिशोब करून, शेवटी चालणे आरोग्यास उत्तम असल्याने चालत जावे असे ठरले. टेस्को लांब असेल असा माझा तर्क होता आणि मी फुकट चालत जाण्यास नाखूष होतो. परंतु बहुमतासमोर मी पड खाल्ली आणि चालायला कबूल झालो. जेमतेम २ मिनिटात मी कबूल केल की टॆक्सीने जाण्यात मजा आली नसती. वास्तविक हॊटेलला येतानाच मी तो रस्ता बघीतला होता, पण तो निसर्गसुंदर आहे हे कसा विसरलो कुणास ठाऊक!!! तो चिमुकला रस्ता, दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ आणि झाडी…अहहह…..मन मोहून टाकणारा देखावा होता.

हा रस्ता तसा छोटाच होता, पण वर्दळच कमी. पायी जाणारे तर फक्त आम्हीच होतो. सकाळच्या वेळी एव्हढी शांतता खूप छान वाटत होती. मग एकेक करत गाड्या दिसू लागल्या. अबबबब किती मॊडेल्स…निम्मी तर मी बघीतलही नव्हती. मध्येच हार्ले डेव्हिडसन वर बसून जाणारे म्हातारे दिसले, पण माझा मागसलेला कॆमेरा असल्यामुळे फोटो घेता आले नाहीत आणि काही घेतले त्यातले अनेक आले नाहीत नीट :( !!!…पण जे काही आम्ही बघीतले ते खरंच लक्षात राहिल असे होते. पुलाखालून सटासट जाणार्या गाड्या, तिथेच अस्मादिकांनी केलेले शूटींग :)

पूल ओलांडून पुढे गेलो आणि पाच मिनिटात बैठी घर दिसू लागली आणि आपण गावाजवळ आल्याचं लक्षात आलं गावाचं नाव होतं वाल्थाम ऎबे. इथेच टेस्को होतं…आमच्या आनंदास उधाण आले आणि पटापट पाय उचलत आम्ही गावात शिरलो…स्वागतालाच एक कबरस्थान होतं. ही जागा, सकाळच्या आनंदी वेळी पण उदास छाया टाकणारी वाटत होती, मग तिथे फार न रेंगाळता आंम्ही टेस्को जवळ गेलो….आणि आ वासून पहात राहीलो…..एव्हढं मोठ्ठ दुकान मी तरी आयुष्यात पाहिलं नव्हत. मग लगेच ट्रॊल्या घेऊन आम्ही आत शिरलो….दोन्ही बाजूला हारीने मांडलेली शेल्फ़्स आणि त्यात विविध वस्तू, स्टेशनरी सेक्शन मधे तर मी हरवूनंच गेलो..अखेर मुश्कीलीने पाऊल उचलून आम्ही मोठ्या आशेने खाद्यपदार्थ सेकशन मधे गेलो.

तिथे सुद्धा सर्व वस्तु इतक्या छान मांडल्या होत्या की विकत घ्यायचा मोह व्हावा!!सुरूवातीला, वा! हे आहे का? अरेच्या! हे पण आहे इ.इ. ह होता होता, आम्हाला जाणवलं की ईथे चणे आहेत, पण आपल्याला दात नाहीत….म्हंजे सामान तर सगळ आहे….पण शिजवणार कुठे??? खिन्न होऊन आम्ही इथे तिथे फिरू लागलो..नशीबाने काही रेडी टू ईट मिळाली…पण ती केवळ नाईलाज म्हणून घेतली. आम्ही आता एव्हढे निराश झालो की मरू दे म्हणून आम्ही कॆब केली आणि इन मधे परत आलो.

सी. रामचंद्र – भाग २

सी.रामचंद्रनी जयंत देसाईबरोबर, भक्तराज, जबान (दोन्ही १९४३), ललकार, मनोरमा(दोन्ही १९४४) आणि सम्राट चंद्रगुप्त(१९४५) हे बोलपट केले. हे सर्व चित्रपट व त्यांचं संगीत गाजलं. जयंत देसाई निर्माता असल्यामुळे सगळीकडेच लक्ष देत आणि मत सुद्धा देत. एकदा एक दु:खी गाण्याच्या रेकॉर्डिंगला ते आले आणि योग्य परिणाम येण्यासाठी कोरस वापरा असं सांगून गेले. सी.रामचंद्र १ आठवड्याने त्यांना रेकॉर्डिंगला घेऊन आले आणि तेच गाणं ऐकवलं….वर म्हणाले,”तुम्ही म्हटल्यानुसार मी कोरस काढला आणि काय सुंदर वाटतंय आता गाणं!!!”. देसाई खुष!!! सी.रामचंद्रपण खुष!!
१९४४ साली सी.रामचंद्र दिल की बात ह्या बोलपटाला संगीत देत असताना, त्यांची भेट प्रसिद्ध कवी श्री.प्रदीप ह्यांच्याशी झाली आणि प्रदीप ह्यांनी सी.रामचंद्र ह्यांना फिल्मीस्तानचे सर्वेसर्वा श्री शशधर मुखर्जी ह्यांच्याशी भेटवलं. हा प्रसंग सी.रामचंद्र ह्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला आणि संगीतकार म्हणून राजमान्यतेची मोहोर त्यांच्या नावावर उमटली असं समजायला हरकत नाही कारण फिल्मीस्तान हे नावच तितक मोठं होतं. अनेक संगीतकार पदरी असलेलं, अनेक कलाकार तंत्रज्ञ पदरी असलेला हा एक मोठा स्टुडीओ होता. तो काळ म्हणजे संगीताच्या सुवर्णयुगाची नांदी होती. मास्टर गुलाम हैदर, रायचंद बोराल, तिमिर बरन, पंकज मल्लिक, के.सी.डे, मास्तर कृष्णराव, केशवराव भोळे,अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश ह्या संगीतकारांनी वेगवेगळे संस्कार्/प्रयोग करून चित्रपटसंगीतात एकेक प्रवाह आणले होते, आणि हळूहळू नवीन शिलेदार पुढे येत होते. एकेकाळी सी.रामचंद्रबरोबर रेकॉर्डिंग स्टुडीओ मधे उमेदवारी करणारा नौशाद अली एक मोठा संगीतकार म्हणून नावारूपाला आला होता. खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास हे प्रस्थापित होते. सैगल-नूरजहान युग ऐन भरात होतं.
१९४६ साली फिल्मीस्तानचा सफर बोलपट सी.रामचंद्रनी केला आणि त्यातील गाणी तूफान गाजली. पुढच्याच वर्षी (१९४७) साजन आणि शेहेनाई हे दोन बोलपट संगीतामुळे तूफान गाजले. साजनचा नायक अशोककुमार होता. तो त्याची गाणी गायचा, आणि अण्णांना तर त्याला टाळायच होतं आणि रफीकडून गाऊन घ्यायचं होतं…सुपीक डोक्यातून अजून एक कल्पना आली….जेव्हां जेव्हां अशोककुमार कामात असेल तेंव्हाच रेकॉर्डिंग ठेवायचं…असं होत होत होत, अशोककुमारच्या लक्षात आलं की वेळं मिळनं कठीण आहे, तेंव्हा त्याने “किसी और से गवां लो” असं सांगीतल आणि रफीने ते गाणं म्हटल आणि उरलेली सुद्धा त्यानेच म्हटली. साजन मधली तुम हमारे हो न हो आणि सुनो बाबु गलीमें तेरी चांद चमका ही गाणी गाजली. शेहेनाई हा चित्रपट तर ऐतिहासीकच म्हणायला हवा कारण इथेच लताबाई आणि सी.रामचंद्र ह्यांनी प्रथम एकत्र काम केलं. मुखर्जींचा विरोध पत्करून लताबाईंना जवानी की रेल चली जाय रे ह्या गाण्यात संधी दिली. त्यानंतर गुरू अनिल विश्वासचा राग पत्करून आना मेरी जान मेरी जान संडे के संडे हे धमाल गाणं दिल. अनिल विश्वास एकदा ह्या गाण्याची आठवण सांगताना एकदम म्हणाले होते,”राम सारखा प्रतिभवान संगीतकार मला गुरू का मानतो हे कोडंच आहे, त्याने काही मला असिस्ट केलं नाही का शिकला ही नाही माझ्याकडून काही, पण माझ मेलडी स्कूल मात्र त्याने हर्क्युलसने पृथ्वी पेलावी तसं पेलून धरल”.
शहनाईचं संगीत तूफान गाजलं. मुखर्जी मेरी जान मेरी जान ऐकून भडकले आणि हे थिल्लर गाण काढा असं म्हणाले…ते गाणं कसंबसं राहील आणि त्यानेच ईतिहास घडवला. अर्थात नंतर पाश्चात्य संगीतातून चोरी मारी सी.रामचंद्रनेच सुरू केली असा आरोपही केला गेला, पण शेहेनाईमधीलच मार कटारे मर जाना आणि हमारे अंगना बाजे शेहेनाई ह्या अस्सल भारतीय गाण्यांचा विचार कोणीही केला नाही. मुखर्जीसुद्धा संडे के संडे गाजल्यावर थंड झाले असावेत. एव्हांना अण्णांचे गायक म्हणून रफी, अमीरबाई आणि शमशाद बेगम ही नाव पक्की होऊ लागली होती.
१९४८ साली आलेल्या खिडकी आणि नदीया के पार ह्या दोन बोलपटांनी कहर केला. खिडकी मधील किस्मत हमारे साथ है, जलने वाले जला करे ने कहर केला, तर नदिया के पार मधील मोरे राजा हो ले चल नदिया के पार हे रफी आणि ललीता देऊळगांव्कर ह्यांनी गायलेल गाणं गाजत होतं. ह्या काळात लताबाईंना किरकोळ गाणी दिली सी.रामचंद्रनी. बहुधा एक संगीतकार म्हणून त्यांचा विश्वास लता मंगेशकर ह्या गायिकेवर अजून बसला नव्हता.
पण १९४९ साल आलं आणि सगळ चित्र बदलून गेलं. लता मंगेशकर ह्या नावाच्या श्रेष्टत्वावर शिक्कामोर्तब ह्याच सालात झालं आणि त्यांनी गाईलेले एकाहून एक सरस बोलपट ह्याच वर्षी आले. ह्या साली एक थी लडकी, बरसात, अंदाज, महल, तराना हे चित्रपट आले. सी.रामचंद्रनी लताबाईंना ह्या एकाच वर्षात नमूना, पतंगा आणि सिपाहिया हे तीन बोलपट दिले. तसंच १९४९ मध्येच त्यांनी सुरैयाबरोबर दुनिया ह्या बोलपटात काम केलं तर राजकुमारीबरोबर जिगर मध्ये कामनमूना, पण लताबाईंबरोबर केलेलं काम अजरामर झाल. नमुना मधलं एक ठेस लगी आंसू टपके, अथवा पतंगामधील दिलसे भूला दो तुम हम,, कधी खामोश हो जाना अथवा ओ जानेवाले तुने अरमानोंकी दुनिया लूट ली असो की सिपाहियामधील लगा है कुछ ऐसा निशन किसीका वा ऐ आंख अब ना रोना असो, ही सगळी गाणी तूफान गाजली.
पुढची काही वर्षं सी.रामचंद्र आणि लताबाईंनी इतकी कहर गाणी दिली की सामान्य जन मोहून गेलेच पण अनेक संगीतकारांनी सुद्धा, लताबाईंसाठी गाणी देणं ही अण्णांची स्पेशालीटी आहे हे कबूल केलं, आणि लताबाईंनी सुद्धा ती गाणी तितकाच स्पेशल टच देऊन गायली. एका मुलाखतीत (बहुदा रेडिफ.कॉम वर मी वाचल हे) श्री. सलिल चौधरी मधुमती मधे असलेल्या आजा रे परदेसी ह्या गाण्याबद्दल बोलत होते. ते म्हणाले,”हे गाणं गाजू लागल्यावर मला फोन आला…कॅन यु इमॅजिन?? अण्णा रामचंद्र…ते म्हणाले सलिल काय छान उपयोग केलायस तु लताच्या आवाजाचा…अगदी १६ वर्षाची मुलगी गात्येय असं वाटतय!! खुद्द अण्णांनी असं म्हटल ही त्या गाण्यासाठी सर्वात मोठी पावती होती.”
१९४९ साल संपेपर्यंत अण्णा एक प्रमुख संगीतकार म्हणून गाजू लागले होते. त्यांचा अनेकांशी स्नेहही झाला होता. लताबाई, नौशाद, एस.डी.बर्मन, हेमंतकुमार, रोशन, अनिल विश्वास, भगवान, ओमप्रकाश, राजेंद्र कृष्ण, प्यारेलाल संतोषी इ.इ. त्यांचे मित्र होते. हिंदी बोलपटातील संगीताच्या सुवर्ण-युगाची सुरूवात अशा पद्धतीने दणक्यात झाली…आणि त्यातील एक बिनीचे शिलेदार होते सी.रामचंद्र.

सी.रामचंद्र भाग १

सूचना:- हे मी आत्तापर्यंत वाचलेले ऐकलेले इ.इ. आठवून लिहितोय. मला आधी माहीत असतं की मी अण्णांचा पंखा होणार आहे तर सगळ्या नोंदी एकत्र ठेऊन दिल्या असत्या, पण तसं नाही. त्यामुळे चु.भु.दे.घे

माणसाच्या मनाचं काही खरं नसत. ओढ एका गोष्टीची असते पण भलत्या गोष्टीला भुलून तीच्याच नादाला लागतो आणि स्वत:चे गुण वाया घालवत बसतो.
१९३२-३३ चा काळ असेल. मिनर्व्हा मुव्हीटोनचा स्टुडीओ. त्या स्टुडीओतील एक दृष्य. एक्स्ट्रॊ कलाकारांची वर्दळ चालू होती. बाकी सगळे लगबगीने आपापली कामं करत होते, तिथेच राम एका सह-एक्स्ट्रॊबरोबर बोलत ऊभा होता. अभिनयाचं वेड घेऊन तो मुंबईत आला होता आणि एक्स्ट्रॊ म्हणून स्थिरावला होता. नशीब ह्याला पळवत होतं, लहानपणी घरच्यांच्या ईच्छेविरूद्ध गाणं शिकायला म्हणून घरातून पळाला, नागपूरला सप्रेबुवांकडे तालीम घेतली आणि नंतर एका नाटक कंपनीने उचलला, हळूहळू सिनेमात गेला…पहिला चित्रपट नायक म्हणून मिळाला, पण तो दणक्यात पडला आणि मग थेट एक्स्ट्रॊ म्हणूनच काम मिळू लागली. दिवस बरे होते पण यश मिळत नव्हत. अजून किती दिवस हे असं काम करायचं आणि आशेवर जगायचं कुणास ठाऊक. त्यांच बोलण चालू असतानाच, एक्स्ट्रॊ पुरवणारा बाहेर आला आणि त्याने तडक वाईट बातमी दिली,”धंदा मंदीत असल्यामुळे स्टुडिओ एक्स्ट्रॊ आणि अन्य कंत्राटी कामगार कमी करणार आहे, त्यामुळे आता इथे काही काम मिळणं कठीण आहे”. हे ऐकून लोकांची चलबिचल सुरू झाली, गलका व्हायला लागला, काही कंत्राटदाराशी बोलून कुठे काय जमू शकते का ते बघु लागले. राम सुन्न होऊन हे सगळ बघत होता…त्याला ब्रह्मांड आठवले. नट होणं सोडाच, पण एक्स्ट्रॊ होणं पण धड होत नव्हत…हे असं का व्हावं त्याला कळत नव्हत. पण त्याला कल्पना नव्हती कि नियती त्याच्याकडे बघून गालात हसत्येय, आणि लवकरच आपण योग्य रस्त्याला लागणार आहोत.
आपली नोकरी जाणं परवडणारे नाही हे राम चांगलंच जाणून होता, पण काय करावे हे त्याला कळेना, त्याने २-३ लोकांना विचारून पाहिले आणि तिथेही डाळ शिजत नाही हे पाहून त्याने थेट सोहराब मोदींना भेटायचं ठरवलं. त्यावेळी मोदी साहेबांचा दरारा काही औरच होता. आधीच त्यांच रुबाबदार खान्दानी व्यक्तीमत्व, जबर्दस्त आवाज, आणि कडक शिस्त ह्यामुळे लोक त्यांना दबकून असायचे. त्यात स्टुडीओचे मालक म्हणजे अजूनच कठीण काम, पण मेलं कोंबड आगीला भीत नाही ह्या न्यायाने, राम अगदी निकाराचा उपाय म्हणून त्यांना भेटला. अपेक्षेनुसा मोदींनी रामच ऐकून घेतलं आणि मग त्याला आपल्या भारदस्त आवाजात म्हटलं,”अरे पण स्टुडीओच्या अवस्थेत मी फक्त तेच लोक ठेऊ शकतो जे सतत कामात असतील, आणि एक्स्ट्रॊ सतत लागत नाहीत हे तुला ठाऊक आहे”. राम म्हणाला, “साहेब, सध्या नोकरी सुटणं मला परवडणारं नाही. मी पडेल ते काम कराय्ला तयार आहे.” मोदी साहेब म्हणाले, “आपल्याला हार्मोनियम वादक हवाय, जमेल का?” राम लगेच उद्गारला, “साहेब सहज जमेल, मी संगीत शिकलोय. मला एक संधी द्या.” मोदींनी रामकडे रोखून पाहिले आणि लगेच संगीतकार मीरसाहेब ह्यांना भेटायची आद्न्या दिली. त्या क्षणी त्यांना आणि रामला सुद्धा कल्पना नव्हती की एका युगाची नांदी झाल्येय.
संगीत विभागात रामच काम जोमाने चालू झाले. मीर साहेब तर भलतेच खुष झाले. एक तर त्यांना किंवा त्यांच्या सहाय्यकांना गाता येत नसे त्यामुळे गायकाला चाल समजावत असताना वांदे होत, त्यात स्वरलिपी पण अवगत नव्हती त्यामुळे सुचलेली चाल लिहिता येत नसे आणि कहर म्हंजे मीरसाहेब विसरभोळे होते….त्यामुळे अनेकदा रेकॊर्डिंगच्या आधी तालमीतच ते चाल विसरायचे. असल्या गदारोळात राम आला आणि त्यांना देव (पक्षी:अल्ला/खुदा) भेटल्याचा आनंद झाला. राम पेटीवर सराईत होता, चांगला गाणारा होता, आणि चाल ऐकल्यावर पटापट स्वरलिपी लिहायचा, त्यामुळे लौकरच तो त्यांचा खास माणूस झाला. मीरसाहेबांबरोबर अजुन एक माणूस रामवर खुष झाला तो म्हणजे दिग्दर्शक मास्टर भगवान. भगवान त्या काळात गल्लाभरू चित्र देणारा यशस्वी दिग्दर्शक. बाबुराव-भगवान, मा.विठ्ठल-भगवान ह्या मारामारी-पटातील तत्कालीन लोकप्रिय जोड्या होत. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असे. असच एकदा मद्रासला काम अडकलं आणि मीरसाहेबांनी भगवानला राम चितळकरला बोलावून घेऊ तो पटकन सगळी कामं उडवेल असं सांगितल. राम मद्रासला गेला, आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून गाडी रूळावर आणली. भगवानला एक कामाचा माणूस भेटल्याचा आनंद झाला आणि रामला सुद्धा भगवानचा कामाचा झपाटा आवडला आणि त्यांची मैत्री जमली. हळूहळू मीरसाहेबांसाठी राम चाली पण रचू लागला. लाल हवेली बोलपटासाठी त्याने चक्क नूरजहान आणि सुरेंद्र ह्यांच्यासाठी एक द्वंद्वगीत रचल आणि गाऊनही घेतलं
एक दिवस अचानक, भगवान ने रामला सांगितलं, “मला एक तामिळ चित्रं मिळालंय आणि त्याचं संगीत तु करायचंस” अशा प्रकारे रामला वनमोहीनी (१९४१) हा पहीला बोलपट मिळाला, त्यानंतर त्याने अजून एक तमिळ चित्रपट केला. पण पुण्या-मुंबईत संधी मिळत नव्हती. अचानक भगवाननेच त्याचे द्वारका खोसला ह्या निर्मात्याबरोबर गाठ घालून दिली आणि सुखी जीवन(१९४२) हा बोलपट मिळाला. त्याच वेळी खोसलांनी त्याची गाठ जयंत देसाईशी घालून दिली आणि राम सम्राट चंद्रगुप्तचाही संगीतकार बनला. ह्याच वेळी निर्माता जयंत देसाईने, अण्णासाहेब, राम चितळकर ही नावं शोभत नाहीत म्हणून रामला एक नाव दिलं सी.रामचंद्र…अशा रीतीने १९४३ साली सी. रामचंद्र हे नाव संगीतकार म्हणून जगासमोर आलं नायक बनण्याच्या नादात आपली प्रतिभा वाया घालवणार्या राम चितळकरला, त्याच्या नियतीने कानाला धरून नशीबाच्या दाराशी आणून ठेवलं

सीवर्डस्टोन – भाग ४

एक-दोन दिवसातच आमची दैनंदिनी ठरून गेली. सकाळी ऊठून आवरायच आणि मग ०८:३० च्या टॆक्सीने ऒफिसला जायच..तिथन परत संध्या. ६:०० ची टॆक्सी घेऊन ईन मधे परत. आता मुद्दा होता भाड्याने घर शोधण्याचा. ह्यात पंचाईत अशी होती की आमची मॆनेजर आम्हाला ९-५ ह्या वेळात ऒफिसमधून सोडेना आणि घर दाखवणारे एजंट्स म्हणेत आम्ही ५ नंतर थांबणार नाही कारण आमचे ऒफिस पण ९-५ असतं. २-३ आठवडे हे असंच चालू होतं. आम्हाला हे सुद्धा कळत नव्हत की आम्हाला इन मधे का रहायला सांगितलं. इन ह्या आपल्याकडील साध्या हॊटेलच्या दर्जाच्या समजल्या जातात, पण जास्त व्यवस्थित असतात. तरीही आम्हाला हे नक्कीच अपेक्षित नव्हत. आम्ही आमच्या भारतातील मॆनेजरला हे बोलून सुद्धा दाखवलं. आमच्या तक्रारी वाढायला लागल्या.

दरम्यान आम्ही वेगवेगळ्या प्रकरे आमचं रहाणं सुसह्य करायचा प्रयत्न करू लागलो. आमचे सहकारी काट-कसर किंग होते. एक रोज मॆगी खायचा. बाकीचे जवळच्या दुकानातून ब्रेड व फ्ळ आणून खायचे.सकाळची न्याहारी आणि दुपारंचं जेवण क्लायंटच्या कॆंटीनमधे. तिथे अस्सल ईंग्रजी न्याहारी आणि जेवणाचा बेत असायचा. एग्ज ऎन्ड बेकन, फ्राईड एग, कॊर्न, ब्रेड-बटर-जॆम, चीज स्लाईस ई.ई.आणि जेवणात कच्चे मांस, ऊकडलेला बटाटा, मटार इ.इ.इ. शाकाहारीच काय पण आमच्यातील मांसाहारीपण उपाशी राहू लागले.सुरूवातीला खूप मजा आली, वेगळ्या प्रकारे बनवलेली अंडी, सॆलॆड्स, मॆश्ड बटाटा इ.इ. खायला छान वाटलं. जेवणाच्या वेळी मला अजून एक धक्का बसला. मला सॆंडविच(सुद्धा) खायचे होते, म्हणून सॆंडविच कऊंटरवर गेलॊ. तेथे एका अवाढव्य काळ्या बाईने स्वागत केले, व्हेज. का नॊन-व्हेज. अशी पॄच्छा केली व तिचा हातमोजा बदलून व्हेज. सॆंडविच बनवू लागली. मी लगेच उकडलेला बटाटा पण घाला असं सागितलं. त्यावर तिने एक टिपिकल लुक दिला आणि, “डू यु वॊंट पोटॆटो सॆंडविच?”. मी म्हटल,”नो…बट आय वॊंट पोटॆटो इन दॆट सॆंडविच”….त्यावर चकित होऊन ती म्हणाली…आम्ही ह्यात बटाटा टाकत नाही…म्हंजे ती इंग्रजीत म्हणाली, मी मराठीत टंकले. दरम्यान माझ्या जोडीदारांनी ईंडीयन टेक अवे ची मेनुकार्ड पार चोथा करून टाकली होती…नाही नाही..म्हंजे कुठले स्वस्त आहे आणि कुठले जास्त ऒप्शन देईल ह्या बाबतीत चोथा केला होता,..पण जवळपास दर सगळेच सारखे होते. आता ह्यावर चर्चासत्र सुरु झालं. मी काळजीत पडलो होतो की आता पैसे वाचवताना ऊपाशी रहाव लागतंय का काय. बोलता बोलता मी, माझी ज्यांच्याबरोबर गट्टी जमली होती त्यांना माझे विचार ऐकवले. तेही माझ्यासारखेच गुट्गुटीत असल्यामुळे त्यांना माझ्या भावना लगेच कळल्या आणि ते म्हणे,”ईनको जाने दो भई…हम तो पेट भर के खायेंगे…वर्ना मजा क्या??”. माझा जीव भांड्यात पडला. आम्ही मग दररोज टेक अवे मधून जेवण मागवू लागलो.

आमच्या इन मधे एक सर्बियन मुलगी होती रिसेप्शनवर, ती खूप गप्पा मारायची. तिने सांगितलं,की जवळच वाल्थाम ऎबे गावात, टेस्को नावाचे एक सुपर स्टोअर आहे. तिथे कदाचित आम्हाला काही चांगले ऒप्शन्स मिळू शकतील. हे ऐकल्यावर आमच्या गोटात आनंदाच्या लाटा ऊठू लागल्या आणि ह्या शनी-रवि. टेस्कोला भेट द्यायची हे नक्की केले.

सीवर्डस्टोन – भाग ३

रात्री झोप छान लागली मऊ मऊ ऊशा आणि गाद्यांमुळे. पहाटेमात्र एक्दम हुडहुडी भरली. स्वतःला पांघरूणात शक्य तेव्हढ गुरफटवून टाकलं आणि परत झोपलो. सकाळी ७ वाजता अलार्म वाजला आणि दचकून उठलो. भराभर आवरल, आणि टॅक्सीसाठी लॉबीत आलो. बाहेर बघतो तर काय??? सगळीकडे धुकं पसरलं होतं. वास्तविक तिथला उन्हाळा ओसरत आला होता, पण एव्ह्ढ्या लवकर धुकं पडेल असे त्या लोकांनाही वाटले नव्हते. टॅक्सीला वेळ होता तेव्हढ्यात मी फोटो काढले. आवारात उभ्या केलेल्या गाड्यांची पाठची बाजू :-) ..अ‍ॅक्च्युअली मला धुके दाखवायचे होते. कॅब यायला वेळ होता त्यामुळे मी आजूबाजूला फिरून अंदाज घेऊ लागलो. मी प्रिमीअर इन नावच्या एका इन मधे थांबलो होतो. वाल्थाम अ‍ॅबे आणि चिंगफोर्ड ह्या दोन गावांच्यामधे  सीवर्डस्टोन नावाचे एक चिमुकले गाव आहे, त्या गावाच्या वेशीत हे प्रिमीअर इन आहे. इथून जवळच ली व्हॅली पार्क नावाचे प्रसिद्ध पार्क आहे. तिथे गोल्फ कोर्स सुद्धा आहे आणि ह्याच नावचे एक गाव पण आहे. त्याच्यापुढे चिंगफोर्ड नावाचे एक मोठे गांव आहे. हे वाल्थाम अ‍ॅबेपेक्षाही मोठे गांव असून इथे श्रीमंत आणि उच्चभू वस्ती खूप आहे, असेही कळले. वाल्थाम अ‍ॅबेमध्ये टेस्को नावाचे एक मोठे सुपर स्टोअर आहे ही महत्त्वाची माहिती सुद्धा मिळाली. तेव्हढ्यात कॅब आली, आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसून मस्त मजा घेऊ लागलो. छोटासा पण अगदी गुळगुळीत रस्ता, त्याच्या दोन्हीबाजूला असलेली वनश्री, आणि धुक, ह्यामुळे अगदी वेगळं वाटत होतं. वाटेत छोटी छोटी गावं लागत होती, त्यातली सुबक घरं, समोरील आटोपशीर अंगण हे बघून खूपच छान वाटलं. ड्रायव्हरदादासुद्धा बोलघेवडे निघाले. त्यांना भारतीय जेवणाची फार आवड!! आठवड्यात १-२ वेळा तरी ते टेक-अवे मधे “चिकन ठिका”,”बठर चिकन” इ.इ. हादडत असतात. त्यामुळे त्यांनी विशेष आपुलकीने बोलायला सुरुवात केली. रोज कार लागणार आहे कळल्यावर त्यांनी स्वटःहून भाड्यात सूट देऊ केली. त्यामुळे माझा उत्साह अजूनच वाढला आणि मी निसर्गाचा मनापासून आनंद घेऊ लागलो.

सीवर्डस्टोन – भाग 2

लेबले (टॅग्ज)

, ,

हीथ्रो विमानतळावर मी उतरलो आणि गर्दीबरोबर वाहता-वाहता सामान गोळा करण्याच्या पट्ट्याजवळ आलो. सगळेजण कमालीच्या शांतपणे उभे होते. जर मी त्यांना पट्ट्यावरून वाहत आलेले सामान उचलताना बघितलं नसतं, तर हे इथे काय करायला आलेत असा प्रश्न मला नक्कीच पडला असता.मी आपला बावळटासारखा त्यांच्याकडे बघत होतो. हळूहळू सामान उचलणारे लोक कमी व्हायला लागले तसा मी काळजीत पडू लागलो. नंतर तर फक्त रिकामा पट्टा फिरू लागला…माझा धीर सुटायला आला होता..माझी मोठी बॅग अजून आली नव्हती….शेवटी बोंब मारायच्या आधी इथे तिथे बघू म्हणून पट्ट्याला चक्कर मारली आणि आमची निळी बॅग तिथे पट्ट्यावर लवंडली होती. एक मोठ्ठा नि:श्वास टाकून मी ती बॅग उचलली आणि इमिग्रेशनच्या दिशेने चालू लागलो. इमिग्रेशन काउंटर वर सुदैवाने फार गर्दी नव्हती. लोक पटापट पुढे सरकत होते. मी त्या काउंटरवरील लोकांपैकी एक सुंदरी अथवा एक मायाळू दिसणारा इंग्रज ह्यांच्यापैकी एकाकडे माझा “लंबर” जावा शी इच्छा मनी बाळगून उभे होतो. अचानक माझ्यापुढचा माणूस डावीकडे वळून पुढे गेला…आणि आपण एका उग्र दिसणार्‍या काळूरामाकडे जाणार ह्याबाबत माझी खात्री पटली. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याने मला हातानेच पुढे बोलावले. मी त्याच्यासमोर जाऊन प्रेमळ आणि स्नेहल असे “हाश्य” केले ज्याचा त्याच्यावर काहीही परिणाम नाही झाला. बहुधा माझ्या चेहेर्‍यावर अवघडलेपण, भीती आदी भाव घाऊक रूपात दाटले होते. तो माझी विचारपूस करणार एव्हढ्यात मागून एक बर्वे, चितळे इ.इ. मध्ये खपेल असा, गोरा, घार्‍या डोळ्यांचा, आणि ५ फूट उंचीचा एक कर्मचारी आला, आणि माझ्यासमोरील रेड्याला,”आज माझ्यासाठी कोणी ठेवू नकोस”. असं म्हणाला. इथले सर्कारी लोकही आपल्यासारखेच, असं वाटून मी कान टवकारले. त्यांच्या संभाषणाचा सारांश असा: आज ईस्लामाबादेहून येणार्‍या विमानप्रवाशांची तपासणी करायला बर्वे (आय मीन तो गोरा) होता. त्याने सगळ्यांना तपासून सोडून दिले. नंतर पोलिसांनी त्यातल्याच एकाला पकडले आणि हलगर्जीपणाबद्दल साहेबांनी त्याला बांबू दिला होता आणि पदावनतीपण केली होती.”तो ईस्लामाबादेतून कसा सुटला ते विचारा ना!!” असे बडबडत तो साह्यबाच्या नावाने खडे फोडत होता. त्याने अत्यंत कोरडेपणाने माझा पासपोर्ट बघितला. सगळं व्यवस्थित असल्याचे खात्री केली आणि मला म्हणाला चेस्ट एक्स-रे द्या. माझ्या पोटात बर्फाची लादी बसली!! हे असं काही न्यावं लागेल हे मला ऑफिसमधले प्रवास विभागतील लोक बोलले नव्हते. माझा दिवाळं निघाल्यागत चेहरा बघून तो मला म्हणाला,”तिथे डावीकडे मेडीकल ऑफिसर आहे, तिथून एक्स-रे काढून आणा”. शेवटी एकदाच ते प्रकरण संपले आणि मी विमानतळाबाहेर आलो.

बाहेर आल्यावर मी नकाशा वगैरे पाहायला सुरुवात केली. त्यांचे नकाशे बनवून तपशील देण्याची पद्धत मला फार आवडते. मला लंडनजवळील सीवर्डस्टोन ह्या वाल्थम अ‍ॅबे ह्या गावाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जायचं होतं. मी नकाशा बघून अंदाज घेतला आणि कटकट नको म्हणून सरळ टॅक्सी करायचे ठरवले. जवळ बघितलं तर काळ्या टुमदार टॅक्सीज दिसत होत्या. त्यात ज्याचा नंबर होता त्याच्याकडे गेलो तर चक्क आजोबा होते ते. त्यांना पत्ता दिल्यावरच त्यांनी सांगितले हे लांब आहे त्यामुळे भाडे जास्त होईल. मी विचारले किटीपर्यंत जाईल? त्यांनी त्यांच्या मीटरकार्ड वाचून सांगितले १४० पौंड. वास्तविक तेव्हा माझी ट्यूब पेटायला हवी होती की हे भाडं जास्त आहे, आणि म्हणजेच बहुधा ठिकाण लांब असेल. पण त्यावेळी प्रवासाचा शीण म्हणा, किंवा साध्या टॅक्स्या जवळ नसल्यामुळे म्हणा, मी त्यांना चला म्हटले. आजोबांच्या चेहेर्‍यावर पूर्ण अविश्वास होता..नंतर त्यांच्याशी बोलताना कळलं, की येव्हढ महाग भाडं घेऊन लोक सहसा जात नाहीत. हे ऐकून माझ्या पोटात कळ आली..म्हटलं आता हे टॅक्सीच बिल ऑफिसने नाही संमत केले तर गेले पैशे खिशातून. बराच वेळ मी चिंताक्रांत बसलो होतो, शेवटी मी मलाच समजावले,”बाबारे, त्याला अजून वेळ आहे. तू आतापासून उदास होऊ नकोस”. तोपर्यंत आम्ही लंडनमधून बाहेर पडलो होतो आणि “ब्रिटिश कंट्रीसाईड” दिसू लागली होती. अंधार पडत असतानासुद्धा दिसणार्‍या त्या दृश्याने मी खूश झालो. अचानक भानावर येऊन मी जमेल तसे फोटो काढू लागलो. मध्येच मला ड्रायव्हर आजोबा कुतूहलाने माझ्या कॅमेर्‍याकडे बघतायत हे ही लक्षात आलं

मी मुकाटपणे जमेल तसे फोटो काढत होतो. पहीलटकर असल्याने मला सगळ्याचंच अप्रूप वाटत होतं. नंतर एक गाव आलं छोटंसं..टुमदार देखणी घर, आखीव रेखीव रस्ते, खूपच छान..पण आमच्या गावचा पत्ता नव्हता. आमच्या ड्रायव्हरआजोबांना मी सुचवले आपण कुठेतरी थांबून चौकशी करू..पण ते फक्त नकाशा दाखवून मला गप्प करत होते. गावावरून थोडं पुढे गेल्यावर त्यांनी गाडी थांबवली नकाशाचा अभ्यास केला आणि गाडी परत वळवली. आम्ही ज्या गावातून गेलो त्याच गावात परत येऊन मूळ रस्त्याला लागलो. आम्ही -३-४ फेर्‍या मारल्या, मी दरवेळी मुकाटपणे फोटो काढत होतो. ३-४ फोटो मी काढले नंतर मी अस्वस्थ झालो आणि आजोबांना सुचवलं आपण कोणाला तरी विचारू या. अखेरीस त्यांना पटले आणि एका स्थानिक बार जवळ त्यांनी एका माणसाला विचारले. त्याने अजून ४ जणांना विचारले, आणि अखेर एक मध्यमवयीन बाई आमच्याकडे स्मितहास्य करत आपल्या गाडीत बसल्या आणि आम्हाला मागे या असे हातवारे केले. आणि आमची गाडी त्यांच्या मागे जाऊ लागली. वाटेत अजून २ फोटो मी काढले. एक साधारणतः २० मिनिटात आम्ही इच्छीत स्थळी पोचलो. त्या बाईचे आभार मानले आणि मी हॉटेलमध्ये चेक-इन केले.

सीवर्डस्टोन – भाग १

लेबले (टॅग्ज)

, ,

मला युरोपचं पहिल्यापासून आकर्षण!!! कारण माहीत नाही पण युरोपिअन देश आणि त्यातही इंग्लंड माझ्या आकर्षणाचं केंद्र होतं आणि आहे. शाळेत शिकवलेल्या इतिहासामुळे म्हणा किंवा वाचलेल्या कादंबर्‍यांमुळे म्हणा युरोपला आणि त्यातही इंग्लंडला जाणे माझे स्वप्न होते.   शेरलॉक होम्स,  रॉबिन हूड,  मोठेपणी डिकन्सच्या कादंबर्‍या आणि बीबीसीवर दाखवलेले सुंदर कार्यक्रम आणि त्यातून दिसलेली सुंदर गावं ह्यामुळे आपण इंग्लंडलाच जायचं असच ठरवलं होत.

देवाची कृपा म्हणा, नशीब म्हणा किंवा काहीही, पण एक दिवस मला आमच्या मॅनेजरने विचारलं, “यू. के. चा प्रोजेक्ट आहे, ६ महिन्यांसाठी जावंही लागेल. जाणार का? ” मला माझी पहिली परदेशवारी इंग्लंडमध्येच करायला मिळाली. मी एकदम हरखून गेलो. आयुष्यात कधीच परदेशात गेलो नव्हतो,  जे जाऊन आलेत त्यांचे फोटो बघत तहान ताकावर भागवत होतो. जे इतके दिवस अशक्य वाटत होत ते एकदम प्रत्यक्षात येणार होतो अन त्यामुळे मी एकदम हवेतच गेलो. घरी आल्यावर बातमी दिली तर घरच्यांनाही आनंद झाला. बायकोलासुद्धा छान वाटलं, पण ती बाळंतपणासाठी माहेरीच होती त्यामुळे भेटता येणार नाही ह्याचं थोडं दु:ख वाटलं.

प्रोजेक्टवर मी रीतसर ऑन बोर्ड झालो.  इंग्लंडातील आमच्या प्रोजेक्ट लीडने माझी चाचणी सुद्धा घेतली. ४-५ दिवसात सगळा प्लॅन ठरला. माझ्याबरोबर अजून ४ जण होते. मी पुण्याचा, २ नोइडातून, १ चेन्नई आणि १ बंगळूर मधून. आम्ही सगळा तपशील वकिलातीच्या फॉर्म्सवर भरून पाठवून दिला आणि ४ आठवड्यांनी व्हिसा येणार ह्या हिय्याने तयारी सुरू केली. पाहता पाहता एक महिना गेला.. आमचा मॅनेजर अस्वस्थ झाला आणि त्याने व्हिसा का आला नाही म्हणून प्रश्नांचा भडिमार चालू केला. आम्हाला तरी कुठं काय माहीत होत?  आम्ही फॉर्म्स नीट भरलेत हे वारंवार विनवून सांगण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. अखेरीस तो व्हिसा आला आणि आमचा जीव भांड्यात पडला… पण तो भांड्यात पडतो ना पडतो तोच आमचा मॅनेजर पेटला तुम्ही मिळेल ते लवकरातलं तिकिट काढून पळा अस आमच्या मागे लागला… अखेर चर्चा,  उपचर्चा, वाद इ. इ. होऊन आम्ही चार दिवसांनी जायचं अस ठरलं. लगेचच तिकिटे बुक होऊन आम्ही ११ सप्टेंबरला प्रयाण केले. आंतर-राष्ट्रीय विमान प्रवासाचा पहिलाच अनुभव (आणि नुसत्या विमानप्रवासाचा दुसराच!! ), त्यामुळे सगळ्या गोष्टीचं अप्रूप.. त्या निळ्या डोळ्यांच्या सुंदऱ्या आणि सुंदर, त्यातच आपले भारतीय सायब लोक.  त्या भारतीय सुंदऱ्या हिंदीतून सूचना द्यायला लागल्यावर मला त्या निळ्या डोळ्यांच्या इंग्रज बायका पार्श्व-आवाज देतायत का काय अशी शंका आली. तसेच ते सुंदर,  इंग्रजी वळणाने हिंदी बोलत होते. मी आपला, त्यांच्यापेक्षा गोर्‍यांशीच जास्त बोलत होतो (म्हणजे कारणापरत्वेच!! उगाचच टाईमपास नाही). आमचे ब्रिटिश एअरवेजचे विमान अखेर उड्डाणाच्या तयारीला लागले. आम्ही तत्परतेने आमच्या खुर्च्यांच्या “पेट्या” बांधल्या. हे पेटी प्रकरण मला नीट कळलं नाही… पट्ट्याला हे पेटी का म्हणतात? असो. तोच विचार करत मी मागे मान टेकली आणि डोळे मिटले.

थोड्यावेळाने मला जाग आली तर भारतीय सुंदरी मला “चाय-पानी विचारत होती”. मी आपला कोलोन वॉटरचा टुवाल घेतला आणि तोंड पुसलं. बेचव चहा कॉफी प्यायची माझी तयारी नव्हती.. मग बीर घेतली :-) विमान दुपारी निघाल होतं, त्यामुळे बाहेर उजेड होता.. विमानातील माहीतीप्रक्षेपकाने अफगाणिस्तानावरून विमान जात असल्याच सांगितलं. मी लगेच मागच्या मोठ्या खिडकीकडे गेलो आणि वाकून खाली हिंदुकुश पर्वत वगैरे शोधू लागलो.. साधारणतः अर्धा तास हा चाळा चालू होता.. शेवटी मुकाट जागेवर येऊन बसलो आणि डुलक्या काढू लागलो. मला प्रवासात तरी एका जागी सलग बसता येत नाही. पाय फुरफुरू लागताअअत. मी खूप प्रयत्न केले, चित्रपट बघितले, झोपलो, वाचायचा प्रयत्न केला पण पायाच फुरफुरणं इतकं तीव्र होत की शेवटी मुकाट दर तासाने पाय मोकळे करून यायचो. बाहेर खूप छान दिसत होतं.. माझा डिजीटल कॅमेरा आणला नाही ह्याचं मला दु:ख झालं. पण माझा नाईलाज होता.. माझ्या विसरभोळेपणाचा इतका धसका सगळ्यांनी घेतला होता की मला रोल घातलेला जुना कॅमेरा न्यावा लागला. इतका मागासलेला प्रवासी कुठल्याही विमानात नसावा.. बरं तो कॅमेरा वरच्या बॅगेतही ठेवू नाही दिला (आणि दिला असता तरी विमानात तो काढण्याची माझी हिंमत झाली नसती). थोड्यावेळाने हा प्रवास कधी संपेल अशी माझी अवस्था झाली.. दरम्यान जेवण झाले, नंतर वाइन झाली.. दुपारची (ही युरोपमधील दुपार) बीर घेऊन झाली आता मात्र कंटाळा येऊ लागला. एवढ्यात आम्ही अर्ध्या तासात हीथ्रो विमानतळावर उतरू अशी घोषणा झाली. सगळा कंटाळा विसरून मी नव्या उत्साहाने उठलो.. ताजा झालो, दात घासले, चेहरा धुतला इ. इ. केले, आणि काचेतून बाहेर बघतो तो काय? संध्याकाळच्या उतरणीच्या उन्हात छोटे छोटे काळे डांबरी रस्ते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला टुमदार लाल छपरांची घरं.. पाहताक्षणी मला ते दृश्य आवडलं आणि मी उत्सुकतेने इकडे तिकडे पाहू लागलो. थोडं दूरवर खुद्द लंडन शहर दिसत होतं.. आमचं विमान हळूहळू उतरायची तयारी करत होतं.. मी सुद्धा लगेच माझं सीट्वरील गबाळं आवरलं आणि विमान उतरायची वाट बघू लागलो. विमानतळावर ३-४ घिरट्या मरून अखेर आमचे विमान मिळालेल्या धावपट्टीच्या रोखाने निघाले…. चाक जमिनीला टेकल्याच जाणवलं… विमान पुढे जातच होत… हळूहळू वळून ते थांबलं आणि उतरणाऱ्याची एकच झुंबड उडाली.

Follow

Get every new post delivered to your Inbox.