१९५२ साल सुरेल संगीताचा वर्षाव करण्याची परंपरा घेउन आलं. ह्या साली अण्णांनी छत्रपती शिवाजी ह्या मराठी बोलपटाला सुद्धा संगीत दिलं. ह्या शिवाय घुंगरू, हंगामा, परछांई, साकी आणि शिनशिनाकी बुबलाबू ह्या बोलपटांना संगीत दिलं. घुंगरू मधली दिले बेकरार सोजा, मै अपने दिल का अफसाना सुना लुं, काली काली रतीयां याद सताए, बदनाम हो रहा है ही खास लता-अण्णा स्टाईल गाणी अवीट गोडीची आहेत. हंगामा मधील, तेरे दर से खुशी मांगी मगर गम दे दिया तुने, मेरी सखी बता, झूम झूम झूम झूम रही प्यार की दुनिया(लता-चितळकर) ही गाणी गाजली. ह्याच्याच थोडं आधीची गोष्ट…..तलत महमूद पार्श्वगायक म्हणून गाजू लागला होता. आपल्या हळुवार, मृदु-मुलायम आणि कंप असलेल्या आवाजात गायलेली गाणी लोकांचा हळवा कोपरा बनली होती. विशेषतः दिलीप-तलत जोडी खास जमली होती. माधव मोहोळकरांनी गीतयात्री मधे लिहिलं, “आमचा लाडका भग्नहृदयी प्रेमवीर दिलीप, जेंव्हा वठलेल्या झाडाजवळ बसून, तलतच्या आवाजात ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल म्हणताना पाहिला तेव्हां किती किती आनंद झाला.” बाबुलनंतर एका संगीतकाराने त्याला त्याचा कंप हा मोठा दोष असल्याचं सांगितलं आणि तलत सपाट आवाजात गाउ लागला..त्याचबरोबर त्याच्या आवाजात दोष आहे अश्या बातम्याही पसरत होत्या. एकदा अनिलदाच्या रेकॉर्डिंगला तलत सपाट आवाजात गात होता. अनिलदा म्हणाला,”अरे तू कोण आहेस? जा इथून आणि आमच्या तलतला घेउन ये.” अनिलदाने तलतला खडसावून सांगीतल की हा नैसर्गिक कंपच तुझा मोठा ठेवाठेवा, नाहीतर गल्लोगल्ली तलत सापडेल. तलत मग नवीन आत्मविश्वासाने गात होता. अण्णांना दुसरे अण्णा म्हंजे शांतारामबापूंनी परछांईसाठी करारबद्ध केलं. अण्णांनी पहिले छूट सांगितलं,”माझ्या रचना लताच गाईल, जयश्रीबाई नाही”. बापू कबुल झाले नंतर एका गाण्यासाठी चाल बांधून अण्णा चर्चा करायला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कल्पनेहुन वेगळ्या प्रकारे चित्रीकरण होणार आहे. बापूंशी लगेच चर्चा झाली आणि बापूंनी अण्णांना नवं गाणं रचायला अवधी दिला आणि शुटींग थांबवलं. अण्णा चाल बांधून गायकाचा विचार करत चालले होते आणि एकदम मदनचं आशियाना बोलपटाचं रेकॉर्डिंग आहे हे आठवलं म्हणून स्टुडिओत डोकावले तर तलत आपल्या मधुर आवाजात गात होता,”मेरा करार ले जा मुझे बेकरार कर जा”. गाण संपल्यावर अण्णा म्हणाले,”अरे तलत तुझ्या आवाजाला काहीच धाड भरली नाही..मी भलतच ऐकल होत..खैर, उद्या ये, आपल्याला गाणं रेकॉर्ड करायचय. दुसर्या दिवशी परछांईमधल, मुहोब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने” हे गाणं रेकोर्ड झाल. माधुर्य हे अण्णांच्या संगीताचा स्थायिभाव होतं. स्त्री गायिकात लता आणि पुरूष गायकात तलतने ह्या माधुर्याची पुरेपुर बरसात रसिकांवर केली. तलतने गायलेली अण्णांची गाणी ऐकताना हा गोडवा जास्त प्रकर्षाने अधोरेखीत होतो. तलतने अण्णांविषयी म्हटले होते,”अण्णा म्हणजे राजा माणूस. एखाद दिवस फोन वाजायचा,”तल उद्या रेकॉर्डिंग आहे, स्टुडिओत ये.” मी म्हणायचो,”अण्णा थोडी तालीम करूया”. तिथून हसून उत्तर यायचं,”काही गरज नाही”, आणि फोन ठेवायचे. पण काय मधाळ चाली द्यायचे!!! संतोषी आणि राजेंद्र कृष्णची गाणी मधात बुडवून काढायचे!!!!!” परछांईमधील सगळी गाणी गाजली. शिन शिनाकी बुबलाबु मध्ये ब्लु नोट्स मध्ये त्यांनी हिंदी सिनेमामधील पहिल गाणं दिल. त्या नंतरही ब्लु नोटमधे फार कमी गाणी आली. शिनशिनाकी मधल लताने गायलेल्,”तुम क्या जानो तुम्हारी याद में” हे गाण तर चिरस्मरणीय आहे. हे गाणं गीतकार संतोषीने लिहिलं. एके काळी त्यांची फार चलती होती. ते निर्माताही होते आणि यशस्वी चित्रपट बनवले त्यांनी. रेहाना ही त्या काळची लोकप्रिय नायिका. कालांतराने संतोषी तिच्या नादी लागले. सतत तिच्याबरोबर असत, तिला बंगला घेउन दिला, पार पागल झाला माणूस!!!! काळ बदलला…संतोषींची सद्दी संपली आणि उतरता काळ सुरू झाला. मग रेहानाने संबंध तोडले, पण प्रेमवेडा संतोषी तिला भेटायला झुरू लागला, दरवाज्याबाहेर भिकर्यासारखा उभा राहिला. थंडीत एके रात्री तिला भेटायला म्हणून गेला, रेहानाने दुरूनच येताना पाहिला व दरवानाला दार बंद करून घ्यायला सांगितलं….वेडा संतोषी त्या तसल्या थंडीत रात्रभर तिच्या दाराशी पडून होता. तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए….रैन गुजारी तारे गिन गिन, चैन से जब तुम सोए……….. १९५२ च्या सुमारास अण्णा चित्रपट निर्माते झाले आणि त्यांनी झांजर हा चित्रपट बनवायला घेतला. ह्या साली त्यांचे झमेला, लहरे व प्रेमनाथनिर्मित शगूफा हे अजून तीन बोलपट आले, पण हे वर्षं लक्षात राहील ते त्यांच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वात उत्कृष्ट संगीतनिर्मीतीमुळे….तो बोलपट होता..फिल्मीस्तानचा अनारकली……..पुढे एकदा बोलताना अण्णा म्हणाले होते, कि झांजर माझ होम प्रोडक्शन…अनारकलीची गाणी हिट होतील हे माहीत असत तर त्या चाली झांजरला दिल्या असत्या.. अनारकलीतील जमाना ये समझा के हम पीके आए ह्या गाण्यावर काम चालू होतं. प्रसंग असा होता की अनारकली अकबरासमोर गाणं सादर करणार अस्ते,पण एक जळणारी तिच्या पेयात दारू मिसळते.अनारकलीच्य ते उशीरा लक्षात येते आणि तो पर्यंत ती अकबराच्या दरबारात पोहोचली असते, आणि तीला गाणं सादर करायचं अस्तं आणि मदीरेचा अंमल सुद्धा लपवायचा अस्तो. शब्द चालीत अलगद बसत होते, पण मुखडयाच्या शेवटची ओळ, जमाना ये समझा के हम पीके आए…पी के आए. ह्यात एका अक्षराचं अंतर पडत होतं आणि ते कसं भराव ते सुचत नव्हत. विचार करून वैतागलेले अण्णा काहि सामान घेऊन घरी गेले. कुलूप उघडताना त्यांना उचक्या येऊ लागल्या आणि ते पुरते हैराण झाले. सामान कसंबसं आत ठेऊन पाणी प्यायले…..आणि एकदम काहीतरी सुचलं..पेटी घेऊन जमाना ये समझा के हम पीके आए (उचकी) पी के आए…असं म्हटल आणि आपला प्रश्न सुटला हे लक्षात आलं. मग लगेच लताला घेऊन रेकॉर्डींगही केल आणि दुसर्या कामात गढून गेले. मुखर्जींनी गाणं ऐकलं अणि ते पिसाळले..ही काय फालतूगिरी आहे, उचक्या बिचक्या काय टाकता असं म्हणाले. पण फिल्मीस्तानने एकदम लो बजेट ठेवल्याने त्यांना काही करता नाही आलं आणि ते गाणं त्या उचकीसकट प्रसिद्ध झालं. तेंव्हापासून बेवड्याच्या गाण्यात उचकी मस्ट झाली.