साल १९५४, ह्या वर्षी अण्णांचं संगीत असलेले कवी, मीनार, नास्तिक, पेहेली झलक, सुबह का तारा हे बोलपट आले. ह्या पैकी नास्तिक ह्या बोलपटाने चांगल यश संपादन केले. हा फिल्मिस्तानने निर्माण केलेला बोलपट होता, आणि अण्णांनी फिल्मीस्तानबरोबर केलेला शेवटचा बोलपट.
ह्या बोलपटातील देख तेरे संसार की हालत, कान्हा बजाए बंसुरी, तेरे फुलों से भी प्यार तेरे काँटो से भी प्यार, गगन झनझना रहा, अरे ओ पत्थर के भगवान ही गाणी खूपच गाजली. ह्या बोलपटाच्या संगीतात अण्णांनी वैष्णव भजनांचा छान उपयोग करून घेतला.
पेहेली झलक बोलपटातील, जमीं चल रही आसमाँ चल रहा है, चरणदास को पीने जो आदत ना होती, सखी कैसे भाए ऋत सावन की ही गाणी लोकांच्या पसंतीस उतरली. जमीं चल रही ह्या गाण्याचा तत्वचिंतनात्मक सूर एव्हढा छान लागलाय की बस्स्…….चरणदासको पीने की जो आदत ना होती हे किशोर्-कुमारने म्हटलेले गंमतीदार गाणे, तर सखी कैसे भाए ऋत सावन की हे खास अण्णा-लता टीमचे छान गाणे…भारतीय शास्त्रीय संगीताने नटलेले.
हे वर्षं अण्णा-तलत टीमचं खास वर्षं. सुबह का तारा मधे तलत-लताचं गया अंधेरा हुआ उजाला चमका चमका सुबह का तारा हे सुंदर युगल-गीत, तर विफल प्रीतीचं गीत अपनी नाकामी से मुझको काम है. ह्या गाण्यातील गिटारीचे तुकडे खूपच छान आहेत. ही अण्णांची खासियतच होती. मीनार मध्ये तलत-लताचं जरा मुडके तो देखो साजना हे युगलगीत, तर कभी तनहाईयोंमें एक ऐसी भी घडी आई ही अप्रतिम गजल तलतने गायली.
कवी बोलपट तर ह्यांच्या कामगिरीचा कळस होता. ह्यात तलतची तब्बल ७ गाणी होती. माझ्या माहीतीनुसार तलतने ५ सोलो, १ लताबाईंबरोबर युगल गीत, एक रफीबरोबर युगल गीत अशी गाणी गाईली. लताबाईंना फक्त ते तलतबरोबरचं युगुलगीत होतं ते म्ह्णजे तेरे रस्ते पे हमने एक घर बना लिया है हे अप्रतिम गीत.
१९५५ ला आझाद, दुनिया गोल है, इन्सानियत, लुटेरा, सावधान, तीरंदाज आणि यास्मिन हे बोलपट आले. इन्सानियत हा दिलीप्-देव ह्यांना घेउन बनवलेला एका तलवारपट. संगीताला भरपूर वाव होता, पण अण्णांनी निराशा केली. ह्यात तब्बल १७ गाणी होती पण चांगली फारच थोडी होती. तलत्-लताच, आई बरखा बहार लाई दिलका करार आणि रफिनं गायलेलं अपनी छाया में भगवन बिठा ले मुझे, मैं हूं तेरा तू अपना बनाले मुझे ही दोन गाणी मात्र गाजली.लुटेरा आणि तीरंदाजला पण छान संगीत दिलं होतं पण ह्यातली गाणी आत्ता माझ्या लक्षात नाहीत. यास्मिनमध्ये परत अण्णांनी धमाल उडवून दिली. हंस हंस के हसीनो ने नजर चार किये जा, मुझ पे इल्जाम्-ए-बेवफाई है, तुम अपनी याद भी दिल से, बेचैन नजर बेताब जिगर ही गाणी तूफान गाजली, पण तरीही वर्षं गाजवलं आझाद ने.
पक्षीराजा स्टुडीओने एक तमिळ बोलपट बनवला आणि तो तूफान चालला. इतका चालला की निर्माता एस्.के.एस. नायडू ह्यांनी चित्रपटाचा सेट तसाच ठेउन एक मोठा हिंदी बोलपट बनवायचे ठरवले. एका महीन्यात चित्रीकरण उरकायचे ठरवले. त्याने मुंबईला येउन दिलीपकुमार आणि मीनाकुमारीला करारबद्ध केले आणि नौशादला संगीतकार म्हणून करारबद्ध करायला गेला. पण एका महीन्यात संगीत द्यायचे, ते ही ८-१० गाणी हे ऐकून नौशाद उखडला आणि त्याने नायडूकडे असमर्थता व्यक्त केली. अखेर नायडूला कोणीतरी(की खुद्द नौशादनेच) राम चितळकरांचं नाव सुचवलं. नायडू चितळकरांच्या दारी आला. अण्णांनी सर्व-प्रथम नौशादहून जास्त मानधनाची अट कबूल करून घेतली. यथावकाश अण्णा आणि गीतकार राजेंद्र कृष्ण मद्रास शहरी दाखल झाले. एका हॉटेलमध्ये नायडूनी व्यवस्था करून ठेवली होती. पुढचे ७-८ दिवस अण्णा आणि राजेंद्र कृष्ण हे दोघेही मद्रास भटकत होते आणि मजबूत खात पीत होते. असं करता करता आठवडा गेला. नायडूला गाण्यांची काळजी वाटू लागली. त्याच बाकी चित्रीकरण आटपत आलं होतं आणि फक्त गाण्यांचं चित्रीकरण राहाणार होतं. अखेर एक दिवस नायडू भडकून हॉटेलवर आला आणि मी गाणी घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशी धमकी दिली. अखेर हा जीव असाच पिडत राहील हे जाणून संध्याकाळी अण्णा हर्मोनियमवर बसले. राजेंद्र कृष्ण समोरच सिगारेटचं पाकीट घेउन बसला, पा़कीटावरच सटासट गाणी लिहीत गेला आणि अण्णा पटापट चाली देत गेले. सकाळपर्यंत ९ गाणी तयार झाली होती आणि नायडूकडे ते कागद देऊन आता रेकॉर्डिंगचं बघा असं म्हणून, हे दोघं परत दंगा करायला मोकळे.
आझादचं रेकॉर्डींगही झटपट आटपलं. त्याकाळी रेकॉर्डींगसाठी मेणाच्या तबकड्या वापरत आणि त्या फक्त ३ मिनिटाचं रेकॉर्डींग करू शकत. काही चूक झाली तर आख्खी तब़कडी वाया जात असे. गाणं लांबलं तर फक्त ३ मिनिटांचच गाण रेकॉर्ड होत असे. पण लताबाईंनी गायलेले जा री जा री ओ कारी बदरीया हे गाण एकाच टेक मध्ये ओ.के. झाल. कितना हंसी है मौसम हे गाणं रेकॉर्ड होताना, तलत येउ शकला नाही, त्यामुळे ते गाणं अण्णा स्वत:च गायले. ते गाणं इतक्या मुलायम आवाजात गायले की अनेक जण गायक तलत आहे असं समजून फसले. गीतकार शैलेंद्र ने तर अण्णांशीच १०० रू. ची पैज लावली आणि अर्थातच तो हरला..
१९५६ साली अण्णांचे ३ बोलपट आले. २६ जनवरी, शतरंज आणि देवता. पैकी शतरंज आणि देवता खूप चालले. शतरंज मधले बदली छुपे चांद ने कुछ मुझसे कहा है हे लता-हेमंतचं गाणं गाजलं. देवतामधील अनेक गाणी गाजली. सगळ्यात गाजलेले आणि अनेक जणांनी ऐकलेले गाणं म्हणजे कैसे आउं जमुना के तीर हे लताबाईंनी गायलेले भैरवीतले गाणे. अण्णांनी ह्यात लताबाईंना अजून एक वेगळे गाणं दिलय, जालीम तेरी आखों ने क्या चीज पिलाई है….लताबाईंनी आपल्या गोड आवाजात सगळी मादकता आणून ते गाणं म्हटलय. तसंच ऐ चांद कल जो आना, सूना है मेरे दिल का जहां ही गाणी आणि खास अण्णांची हातखंडा अंगाई दो नैनो का बना झूलना. आशाबाईंनी खास आपल्या मादक शैलीत आणि खणखणीत आवाजात म्हटलेले फूलोंके मेले हम है अकेले आणि लता-तलतचं सुमधुर युगुलगीत, किसी से प्यार है हमको मगर हम ना बताएंगे.